हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पर्यटनांच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. हा मार्ग पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ते दिगरज (जि. वर्धा) असा एकूण ८०२ किलोमीटरचा आहे. हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील ६० गावांतून, तर सांगली जिल्ह्यातील १९ गावातून जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात या शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असल्याने आता भूसंपादन करण्यासाठी
प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रे जोडण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग उभारण्यासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च आहे. यातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सर्व धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पर्यटनाच्या दृष्टीने गेल्या एक वर्षापासून शक्तिपीठ महामार्ग उभारणीसाठी तयारी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणीचा अभ्यास करण्यात आला आहे. सर्व मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने राजपत्र व अधिसूचना जाहीर केली आहे. या शक्तिपीठ मार्गात पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ते दिगरज (जि. वर्धा) या अंतर्गत येणाऱ्या १२ जिल्ह्यांतील १२ हजार ५८९ इतक्या गट नंबरमधील २७ हजार ५०० एकरांतून हा महामार्ग जाणार आहे; मात्र या शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी व गावागावांतून तीव्र विरोध होत आहे. अनेक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ एकत्रित येत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उभे राहिले आहेत.
भरपाई मात्र दुप्पटच?
यापूर्वी शासनाचे रस्ते, महामार्ग, प्राधिकरण यासह विविध कारणांसाठी शेतकरी व ग्रामस्थांची जागा हस्तांतर केल्यास त्यांना शासन चौपट भरपाई देत होते; मात्र आता होणाऱ्या जमीन हस्तांतरात शेतकऱ्यांना फक्त दुप्पट भरपाई देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच कोल्हापूर व सांगली भागातील बागायती जमिनी जाणार असल्याने या महामार्गाला विरोध वाढला आहे. त्यामुळे हा महामार्ग नकोच, असेच गावागावांतून ऐकायला मिळत आहे.
जिल्ह्यांतील अधिकारी
मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसाठी मिरज प्रांताधिकारी, आटपाडी तालुक्यासाठी विटा- खानापूर प्रांताधिकारी, शिरोळ व हातकणंगले तालुक्यांसाठी इचलकरंजी प्रांताधिकारी, करवीर तालुक्यातील करवीर प्रांताधिकारी, कागल तालुक्यातील राधानगरी प्रांताधिकारी, भुदरगड व आजरा तालुक्यांसाठी भुदरगड प्रांताधिकारी, तर सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांसाठी सावंतवाडी प्रांताधिकारी यांची भूसंपादन करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.
- कागल तालुक्यातून नागपूर-गोवा राष्ट्रीय महामार्गाला होणाऱ्या विरोधाची कारणे
- रस्त्यामध्ये जमीन जाणार असेल तर काय कराल